नेवासा/प्रतिनिधी
नेवासा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुकाणा येथे अब्दुल भैया शेख संपर्क कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेवासा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुकाणा येथे राष्ट्रवादीचे युवक नेते अब्दुलभैया शेख यांच्या संपर्क कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या “जनता दरबार” उपक्रमाला सलग दोन वर्षांपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शनिवार दि.२४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारास देखील नागरिक, शेतकरी, महिला, युवा वर्ग तसेच वडीलधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या जनता दरबारामध्ये मांडलेल्या विविध समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाहीसाठी दिशा दिली गेली. यापैकी सुमारे ५०% समस्या जागेवरच निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित प्रलंबित समस्यांवर पाठपुरावा करून त्या सोडवण्याची खात्री यावेळी देण्यात आली.
यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना
अब्दुलभैया शेख म्हणाले, नेवासा तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि मनमानी सुरु असल्याची बाब अधोरेखित झाली. कूपन,डोल यांसारख्या शासकीय सेवा व योजनांमध्ये दलालीची भूमिका वाढत असल्याबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या पार्श्वभूमीवर निष्क्रीय अधिकाऱ्यांविरोधात तसेच दलाली समाप्त करण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल.
गोरगरीब नागरिक, शेतकरी व महिला वर्ग यांच्या न्यायासाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचे सांगत, यापूर्वी झालेल्या आंदोलनांचे परिणाम जनतेने पाहिल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पुढील काळात कूपन-डोल संदर्भातील भ्रष्टाचार उघड करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी गरज पडल्यास आंदोलन छेडले जाईल, तसेच बचत गट संदर्भातील चालू असलेले एक मोठे स्कॅम सुद्धा लवकरच समोर आणण्यात येईल.


