नेवासा/प्रतिनिधी
बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि शेवटी मरणाची व्यथा प्रत्येकात असते. व्यथा चुकवण्यासाठी मनुष्य जन्म असल्याने प्रत्येक टप्प्यावर जागे राहून संत संगत व आध्यात्मिक वसा जपला जावा. मरणाला विसरु न देता अहंकार विरहित जो जगतो तोच ख-या अर्थाने जागा राहतो. असे प्रतिपादन रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांनी व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील जेष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित किर्तनात ढोक महाराज बोलत होते.
राजेंद्र दरंदले, विनायक दरंदले, सुधीर दरंदले व अमोल दरंदले यांनी संतपूजन केले. संत नामदेव महाराज यांच्या ‘उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा’ अभंगावर निरुपण करताना ढोक महाराज यांनी संतांचा महिमा सांगताना जीवनात ग्रंथातील अलौकिक विचार आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व योगेश्वरी महाराज दरंदले यांनी आपल्या मनोगतात सोपानराव दरंदले यांच्या आठवणींना ऊजाळा दिला. पंढरीनाथ महाराज तांदळे, बाळकृष्ण महाराज सुडके, रामेश्वर महाराज कंठाळे, गोविंद महाराज निमसे, साध्वी तुलसीदेवी, विठ्ठल महाराज खाडे, कृष्णाई गुरुकुलच्या तेजस्विनी महाराज नवले, सुनीता महाराज कुसळकर, सागर महाराज टेमक, किशोर महाराज चव्हाण, वांढेकर महाराज आदी उपस्थित होते.
उपस्थित संत, महंतांचा सत्कार अनिल दरंदले, पत्रकार सुनिल दरंदले यांनी केला. महिला किर्तनकारांचा सत्कार अनिता शिंदे, सुनीता चौधरी, अनुराधा सोनवणे व ज्योती कोतकर यांनी केला. ‘स्मृतीगंध नानांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करुन उपस्थितांना त्याचे वितरण करण्यात आले.
एस.बी.शेटे यांनी सुत्रसंचालन केले.



