माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरीत कामांसाठी केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून ८०० कोटी रुपये मंजुर झाले असल्याची
माहिती राज्याचे महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.या संदर्भात ना.विखे पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांना पत्र देवून निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरीत कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
याबाबत मंत्री ना.विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, नाबार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारने निधी देण्यास मान्यता दिली आहे.निळवंडे धरण पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. मात्र शेतक-यांच्या बांधापर्यंत पाणी
पोहचण्यासाठी वितरीकांची काम होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठया प्रमाणात निधी लागणार असल्याने भविष्यात निधीची अडचण होऊ नये यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून नाबार्डद्वारे निधी उपलब्ध करून दिला. नाबार्ड मार्फत मंजूर झालेल्या निधीतून प्रकल्पाची
उर्वरित कामे पूर्ण करुन शेतक-यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोच करणे हेच एक उद्दिष्ट असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी व शेतक-यांना शाश्वत पाणी पुरवठा होण्याकरीता वितरण प्रणाली चांगल्या पध्दतीने कार्यान्वित
करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली असून, नाबार्ड मार्फत होणा-या निधीतून ही काम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीचा उपयोग होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.