Friday, March 28, 2025

सेंद्रिय कृषि निविष्ठांचा शेतीमध्ये वापर काळाची गरज-नारायण निबे

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

हरीतक्रांती नंतर कृषिक्षेत्रात रासायनिक खते, किटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यात कॅन्सर, शुगर आणि बी.पी. या सारखे आजार वाढत असतांना दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कृषि निविष्ठा तयार करून त्यांचा वापर विविध तृणधान्य, गळीतधान्य, भाजीपाला तसेच फळ पिकांमध्ये करणे गरजेचे असल्याचे
दहिगाव-ने कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विषय विशेषज्ञ नारायण निबे यांनी सांगितले.

दहिगाव-ने (ता. शेवगाव) येथील कृषि विज्ञान केंद्रात ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांमध्ये शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायाचे कौशल्य निर्माण व्हावे यासाठी ग्रामीण युवकांसाठी सेंद्रिय कृषि निविष्ठा निर्मिती आणि त्यांचा शेतीमध्ये वापर या विषयाचे ५ दिवसीय ग्रामीण युवक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

सदर प्रशिक्षणात सेंद्रिय कृषि निविष्ठा उत्पादन भविष्यातील संधी,सेंद्रिय कृषि निविष्ठा शेतीमध्ये महत्व ,शेतीसाठी विविध सेंद्रिय कृषि निविष्टा तयार करणे व वापर कंपोस्ट खत निर्मितीचे विविध प्रकार व त्यांचा वापर, सेंद्रिय कृषि निविष्ठा(किड व रोग नियंत्रण साठी ), प्रात्यक्षिक सेंद्रिय कृषि निविष्ठा ( दशपर्णी अर्क, लसून मिरची अर्क, वेखंड अर्क, ब्रह्मास्त्र, अग्निस्त्र, इ. ),जैविक खते निर्मिती तंत्रज्ञान व त्यांचा शेतीमध्ये वापर,मायको-हायझा उत्पादन तंत्रज्ञान व त्यांचा शेतीमध्ये वापर, सेंद्रिय कृषि निविष्ठांचा भाजीपाला, फळपिके आणि फुल पिकांमध्ये वापर , सेंद्रिय कृषि निविष्ठांचा पिकांमध्ये वापर, कृषि विज्ञान केंद्र, प्रक्षेत्र, वेस्ट डीकंम्पोझर प्रकल्प आणि रस्तापूर जैविक खते निर्मिती प्रकल्प भेटिचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम सहाय्यक प्रकाश बहिरट , यांनी या प्रशिक्षणात कंपोस्ट खत निर्मितीचे विविध प्रकार व त्यांचा वापर या विषयावर तर पिक संरक्षण विषय विशेषज्ञ माणिक लाखे यांनी किड व रोग नियंत्रण करण्यासाठी विविध सेंद्रिय कृषि निविष्ठांचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने अंतर्गत ग्रामीण भागातील १५ ते ३५ वयोगटातील तरुण तरुणीसाठी ५ दिवस ग्रामीण युवक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विद्या विभाग कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या अंतर्गत केल्याचे श्री. निबे यांनी सांगितले. या प्रशिक्षणात जवळजवळ १२ महिला तसेच ३४ युवकांनी सहभाग घेतला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!