Saturday, April 26, 2025

परंपरावाद्यांची वापसी रोखण्यासाठी काम करण्याची गरज- कॉ.भालचंद्र कांगो

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

 नेवासा

तुम्हां सर्वांना मुकुंदराव पाटील यांच्या या कार्यक्रमाला हजर राहणं महत्त्वाचं वाटलं यावरूनच तुमची बांधीलकी माझ्या लक्षात आली, पण ही बांधिलकी फक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्ती असू नये. तर आपल्या समाजात सत्यशोधक
विचार कसे पसरतील, समाजात जी काही परंपरावाद्यांची वापसी होती आहे ती कशी रोखली जाईल याच्यासाठी आपण आता काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं.आम्ही परंपरावाद्यांना यशस्वी होऊ देणार नाही हीच मुकुंदराव पाटलांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी केले.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथे  सत्यशोधक दीनमित्रकार  मुकुंदराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती निमित्त  राज्यस्तरीय पत्रकारीता-साहित्य पुरस्काराचे वितरण रविवार दि.२२ डिसेंबर 2024 रोजी  तरवडी येथे
कॉम्रेड कांगो यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. राधेशाम जाधव,ॲड. देसाई देशमुख, दीनमित्रकार  मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अंभग, उपाध्यक्ष कॉम्रेड बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील, इत्यादी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.

*कॉ.कांगो पुढे म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना मुकुंदराव पाटील आणि त्यांची सत्यशोधक चळवळ सांगण्याची गरज नाही. बहुजनांमध्ये आज जी शिक्षित क्रांती झालेली आहे त्याचं श्रेय मुकुंदरावांना आहे. हे महाराष्ट्राच्या पहिल्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्याला माहिती होतं म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी मुकुंदराव पाटलांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे अभिनंदन केले.

कॉ.गोविंदराव पानसरे मला सांगायचे की १९८४ नतंर महाराष्ट्र आता पुरोगामी राहिलेला नाही. फुले-शाहू- आंबेडकर यांचे नाव घेणे महाराष्ट्राच्या लोकांनी बंद करून टाकल आहे. ते मला सांगायचे की पुरोगामी-प्रतिगामी हे शब्द वापरू नको, कारण लोकांना प्रतिगामी म्हणजे काय माहिती नाही आणि पुरोगामी म्हणजे काय? वगैरे माहिती सांगण्यापेक्षा प्रगतिशील म्हणजे काय हे जरा परत एकदा सांगण्याची गरज आहे.
आता परिस्थिती बदललेली आहे. राजकारणाचा पोत इतका झपाट्याने बदललेला आहे की बाकीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे राजकारण मूल्यहीन झालंय वगैरे मी म्हणणार नाही. परंतु आपल्यापुढे आव्हान असे आहे की मागच्या २० व्या शतकामध्ये हिंदू धर्मामध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी म्हणून शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी आणि इतर सगळे तसेच अनेक डाव्या चळवळीतील आणि इतरही पुरोगामी लोक संघर्ष करत होते. आता नवीन मांडणी केली जाते की हिंदू धर्मामध्ये सुधारण्याची गरजच नाही.
हजारो वर्षाचा धर्म फार महान असल्यामुळे त्याच्या परंपरा पाळणे म्हणजेच योग्य आहे आणि बहुसंख्यांकांना ते मान्य आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं.

आत्ताच आपल्या राज्यघटनेची ७५ वी वर्ष साजरी करण्यासाठी पार्लमेंट मध्ये डिबेट झालं. त्यांचा मुकुंदराव पाटील, महात्मा फुले यांच्या चळवळीशी संबंध नाही, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या राज्यघटनेने सरकारवर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रूजवीण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याचा उल्लेखही या चर्चेत झाला नाही.

जगामध्ये व्यक्ती ही कुठल्याही जातीची , कुठल्याही धर्माची,कुठल्याही भाषेची, कुठल्याही रंगाची असो, स्त्री असो की पुरुष असो,व्यक्ती समान आहे हा संदेश भांडवलशाहीने दिलेला आहे आणि तो भारतात आल्यानंतर तो त्या त्या परिस्थितीनुसार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महापुरुषांनी केलं. त्यामध्ये महात्मा फुले, मुकुंदराव पाटलांसारखी मंडळी होती.
जातीच्या विरुद्ध सामाजिक समता हा उदघोष आणि त्याच्यासाठी काही कार्य करण्याची जबाबदारी भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी चळवळ करून लोकशाही मजबूत केली पाहिजे.
आपण तयार केलेल्या लोकशाहीच्याच माध्यमातून ते लोकशाही नष्ट करून आपल्यावरच पुनर्घात करण्याचा आता परंपरावादी लोक प्रयत्न करतात. म्हणजे काय केलं त्यांनी, जातीने भारतीय व्यवस्थेमध्ये अनेक छोट्या छोट्या जाती आहेत की ज्या स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही त्यांना निवडून येण्यासाठी एक व्यापक काहीतरी आयडेंटिटी लागते आणि ती व्यापक आयडेंटिटी धर्माच्या नावावर मिळू शकते याचं भान त्यांना आलं आणि म्हणून त्याचा भाग घेऊन त्यांनी लोकशाही लोकांना अधिकार मिळवून दिले आणि त्याच्यामधनं आपल्याला वाटलं की व्यक्ती स्वातंत्र्य, समानता ही पुढे जाईल पण त्याचाच उपयोग करून, त्या शक्तीचा उपयोग करून त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, समानता ही लोकांच्या चर्चेतून नष्ट होईल अशा प्रकारची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह असं मला वाटतं. आज मुकुंदराव पाटलांचं स्मरण करताना आपल्यापुढे असलेले सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते कसं पेलायचं ह्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला आणि ह्याच्यासाठी एक व्यापक एकजुटीची गरज आहे. ही व्यापक एकजूट भारतीय संविधानाची जी मूलतत्त्व आहे.
सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणं आणि आधुनिक विचार घेऊन पुढे जाणं हे आपण ज्या दिवशी थांबू त्यादिवशी आपण मागे सरकायला सुरू होऊ आणि त्यामुळे मला असं वाटतं की २० व्या शतकामध्ये मानवी प्रतिष्ठा, मानवी हक्क यांना घेऊन आपण जे संघर्ष केले ते २१ व्या शतकात पुन्हा एकदा करावे लागणार आहे. त्या संघर्षासाठी तयारी करू या.

*श्री.नरेंद्र घुले म्हणाले की, कांगो साहेब यांनी देशाची आणि राज्याची सगळी परिस्थिती मांडली. नवीन तरुण पिढी पुस्तक प्रेमी तर आहेतच परंतु त्यांना टीव्हीवरचं जास्त आकर्षण असतं आणि त्याचा लगेच इम्पॅक्ट हा समाजामध्ये होत असतो. माध्यमांवरती जी चर्चा होत असते त्याच्यातून समाजाचं मत बनत असतं. शाहू फुले,डॉ. आंबेडकर, महात्मा गांधींनी जी चळवळ उभी केली आणि त्याच्या मधून प्रतिगामीतून पुरोगामीला समाजामध्ये आणलं आणि काही लोकांनी ते हायजॅक केलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन पूर्ण देशाचा आणि राज्याचा वातावरण हे बदलून टाकलं. सत्याला सत्य म्हणायचं नाही किंवा मानायचं नाही अशा ब्रेन वॉशिंग करण्याचा कार्यक्रम झाला.सध्याच्या परिस्थितित विचाराला फारसं महत्त्व न राहता प्रॅक्टिकल काम कसं होईल अशी एक मानसिकता समाजामध्ये झालेली आहे. धार्मिकतेचे आवरण लावून मतांचे ध्रुवीकरण केल जात आणि तिथं कोणाचाच काही शहाणपण चालत नाही. म्हणजे तुम्ही काय काम केले किंवा तुमचे विचार काय आहेत हे काहीच बोलायचं नाही. जिकडे सत्ता असेल तिकडं तो थांबतो आणि सत्तेसमोर कुणाचं शहाणपण चालत नाही. त्याच्यामुळे जो देशाचा पंतप्रधान जो असेल त्या पक्षात सगळेच आपोआप सामील होतात. माणसं ५० वर्ष एका विचाराने राहिली आणि समाज प्रबोधन करून समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, त्यांच्यामध्ये असणारा संयम आता नवीन पिढीमध्ये हळूहळू कमी होत चाललेला आहे.
आपले शरीर हेच मंदिर आणि आपले कर्म हाच आपला देव हा साधा सोपा उपदेश संत गाडगे महाराजांनी त्यावेळेस आपल्याला केला.
जो काम-कष्ट करेल, प्रयत्नवादी राहील त्याचं जग आहे हे महात्मा फुलेंनी आपल्याला सांगितलेलं आहे.समाजाच्या विरुद्ध जाऊन हे विचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजून सांगायचं काम आपण करता आमचा आम्हाला नेहमी आपला अभिमान आहे.

*राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराचे मानकरी राधेशाम जाधव म्हणाले, आज हा पुरस्कार स्वीकारताना गोविंदराव पानसरे प्रतिभा हरी नरके यांचे तीव्रतेने आठवण होत आहे.
पत्रकारिता आणि माध्यमाबद्दलची एकत्रित भावना काय आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. माध्यमांनी काय करावे आणि काय करू नये हा त्या त्या माध्यमांच्या मालकांचा आणि संपादकाचा प्रश्न आहे असा आपण म्हणतो पण जेव्हा माध्यम शोषण व्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करायला लागतात ती मात्र गंभीर गोष्ट आहे आणि आपण खूप संघर्षाचे काळात उभे आहोत असे मला वाटते. माध्यमे ज्या पद्धतीने वैचारिक शोषणाला पाठबळ देता आहेत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.ही वैचारिक शोषणाची चौकट संस्थांत्मक शोषणात येते, मग ती शिक्षण संस्था असो, माध्यम संस्था असो की पोलीस यंत्रणात असो या संस्थांमध्ये शोषणाचे बळकटीकरण होत आहे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात शोषण होते हे समजण्याचे बंद होते तेव्हा निवडणुकीचे निकाल कसे लागतात हे आपण पाहिले आहे. मुकुंदरांवाच्या नावाने दिलेल्या या पुरस्काराचे मोल खूप मोठे आहे, त्यामुळे जबाबदारी म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. सत्यशोधकी विचारांशी कधीही प्रतारणा करणार नाही अशी ग्वाही ही देतो.

कार्यक्रमास डॉ. सुधाकर शेलार,डॉ. रामराव भोंग, काशीनाथ नवले, अशोकराव मिसाळ,अनिल शेवाळे, प्राचार्य शिवाजीराव देवढे,डॉ.अशोकराव ढगे, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, बाबासाहेब घुले, मुख्याध्यापक सावता गायकवाड,कॉम.सुभाष लांडे,कॉम बंशी सातपुते, कॉम स्मिता पानसरे, संध्या लांडे, भगवानराव गायकवाड,अड.रविंद्र गव्हाणे, कारभारी तुपे, बाबासाहेब घुले, सचिन क्षिरसागर, बाबासाहेब नाईक,रविंद्र अभंग आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी प्रस्ताविक केले. सुनिल इंगळे व प्रा. संजय दरवडे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत पाटील यांनी आभार मानले.

*यांना मिळाले पुरस्कार—*

पुणे येथील पत्रकार राधेशाम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने तर डॉ.अशोक काळे,नागपूर (अपहरण कादंबरी),डॉ.संदिप राऊत,अमरावती (चरित्र-नवयुग प्रवर्तक संत गाडगेबाबा), डॉ.श्रीधर पवार,मुंबई (संशोधन-ब्लॅक पँथर), सुनिल शेलार, नाशिक(कथा- झापड), डॉ.गोविंद काळे,लातूर (समिक्षा- दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची खंडकाव्ये) यांना साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 *देवकिसनजी सारडा यांना श्रद्धांजली*
दै.सार्वमत-देशदूचे संस्थापक स्व. देवकिसनजी सारडा यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 पुरस्काराची रक्कमेची स्मारक समितीला देणगी..
पत्रकार राधेशाम जाधव यांना दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्काराचे मानपत्र व रोख रक्कम प्रदान करण्यात आले.मात्र श्री.जाधव यांनी सदर रोख रक्कम दीनमित्रकार स्मारक स्मारक समितीला देणगी म्हणून परत केली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!