Tuesday, April 22, 2025

संत तुकाराम गाथेतील अभंग दृकश्राव्य स्वरूपात आणणार-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी

राज्य शासन संत आणि वारकऱ्यांच्या नम्रता व शालीनतेच्या शिकवणुकीनुसार वाटचाल करत असून, संत तुकारामांची गाथा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने उचलले आहे. गाथेतील साडेचार हजार अभंग नामवंत गायकांच्या आवाजात स्वरबद्ध करून दृकश्राव्य माध्यमातून सादर केले जाणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर, ह.भ.प. श्रीकांत गणेश राजा (तामिळनाडू), ह.भ.प.कृष्णा महाराज शिऊरकर (कर्नाटक),ह.भ.प. उद्धव महाराज कुकुरमुंडेकर (गुजरात), ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाने यावर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे असे नमूद करून उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई यांच्या साहित्यातून मराठी अभिजात भाषेचे दर्शन घडते. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आहे. वारकऱ्यांची परंपरा व किर्तन गावोगावी पोहोचविण्यासाठी वारकरी साहित्य संमेलनांचे ग्रामीण भागात आयोजन होणे गरजेचे आहे. संत साहित्य गावागावांत पोहोचले तर इंग्रजीच्या प्रभावात घट होऊन मराठीबद्दल प्रेम वाढणार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठीचा सन्मान केला पाहिजे.

मराठी भाषा विभागाचे कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय आहे. जगात १७ बृहन्महाराष्ट्र मंडळे आहेत. येत्या काळात या मंडळांची संख्या वाढवून ५० करण्यात येणार आहे. आपल्या संत साहित्याचे श्रेष्ठत्व जगाला कळावे यासाठी परदेशातही संत संमेलन भरविण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी १५ लाख रुपयांचे अर्थासहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

श्री.कोळेकर म्हणाले, महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा टिकविण्यात संत, वारकऱ्यांचे अमूल्य योगदान आहे.
ह.भ.प.नामदास महाराज, श्रीकांत गणेश राजा, कृष्णा महाराज शिऊरकर, उद्धव महाराज कुकुरमुंडेकर,चैतन्य कबीर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केल्याबद्दल वारकरी विठ्ठल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ह.भ.प.वै.भाऊसाहेब महाराज पाटील (निपाणी, कर्नाटक), ह.भ.प.वै. पांडुरंग महाराज काजवे (कोगनोळी, कर्नाटक) व ह.भ.प.वै. बाळासाहेब भारदे (माजी विधानसभा अध्यक्ष) यांच्या वारसांनी या पुरस्काराचा स्विकार केला. वारकरी संप्रदायात विशेष कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार ह.भ.प. गोपाळ महाराज गोसावी यांना जाहीर झाला. त्यांच्यावतीने ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. याप्रसंगी महाराज यांचे वंशज ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास यांना चारचाकी वाहन प्रदान करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!