नेवासा/प्रतिनिधी
मुलांना मोबाईल ऐवजी मैदानी खेळाची आवड लागावी म्हणुन सौंदाळा ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय मुलांच्या पालकांचे क्रिकेट सामने घेण्यात आले, त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.
यावेळी न्यायाधीश दिनकरराव आरगडेम्हणाले की, हल्लीची मुले मोबाईल मुळे मैदानी खेळ खेळताना बिल्कुल दिसतं नाहीत. त्यामुळे मुलांच्या मध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो, निरोगी शरीर नाही. मोबाईलचा अतिवापर ही जागतिक समस्या झाल्याने मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी असे उपक्रम करणे आता काळाची गरज आहे.
‘खेळ’ हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर येते ते युवक, युवती, विद्यार्थी यांनी भरलेले मैदान, धावणारे खेळाडू, प्रेक्षकांचा जल्लोष आणि निरोगी स्पर्धा. मुळात कोणताही खेळ हा नेहमी खेळण्यासाठी असतो. शारीरिक हालचाल, सांघिक भावना, मैदानातील संघर्ष आणि हाच आजचा संघर्ष भविष्यातील मोठ-मोठी संकटे मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण करतो.खेळाचा आत्मा हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक गुंतवणुकीत असतो. मोबाईलवर खेळणे म्हणजे खेळाच्या या मूळ आत्म्यापासून दूर जाण्यासारखे आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने एकत्रितपणे या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे.मुलांना पुन्हा मैदानाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मैदानांची उपलब्धता, खेळांचे प्रोत्साहन आणि खेळाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. म्हणून सौंदाळा ग्रामपंचायत कडुन गावात गावातील क्रिकेट संघाचे सामने आयोजित केलेले होते.
ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या गावातील पालकांच्या क्रिकेट सामन्यात ८ संघ सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत संघ,२२० केव्ही सबस्टेशन संघ, शिवतेज संघ, सुधीरभाऊ संघ, सचिनभाऊ संघ,ओल्ड ११ सौंदाळा, आदर्श संघ इ. संघ सामने खेळले.
कॉटर फायनल शिवतेज संघ,
सेमी फायनल २२० केवी सबस्टेशन
आणि फायनल श्रीदत्त ११ हे संघ विजयी झाले.
विजेत्या संघाला व उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी बक्षीस देण्यात आली.
न्यायाधिश दिनकरराव आरगडे,संजय आरगडे, ज्ञानेश्वर आरगडे, भिवसेन गरड,किशोर मुरकुटे,विजय मुरकुटे,सर्जेराव चामुटे,महेश चामुटे,किशोर चामुटे,बाळासाहेब बोधक, बंडु आरगडे,प्रमोद चामुटे, बाबासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, कल्याण ठुबे, बबन आरगडे,राजेंद्र आरगडे आदी यावेळी उपस्थित होते.


