श्रीक्षेत्र शेगाव/प्रतिनिधी
औषधी वनस्पतींचे संवर्धन ही फक्त शासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
बुलढाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विसावा भक्तनिवास संकुल परिसरात मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी राष्ट्रपती महोदया म्हणाल्या की, औषधी वनस्पतींचे संवर्धन ही फक्त शासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ झाली पाहिजे. योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून संतुलित व आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री ॲड. आकाश फुंडकर, पालकमंत्री मकरंद जाधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य मेळाव्यात नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी, आयुष पद्धतीने उपचार, वनौषधी प्रदर्शन, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थी व नागरिकांसाठी माहितीपूर्ण व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
तसेच २६ फेब्रुवारी रोजी ‘घरचा वैद्य: आजीबाईंचा बटवा’ प्रशिक्षण, २७ फेब्रुवारी रोजी वयोश्री व ADIP शिबिर आणि २८ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्रतपासणी असे विशेष कार्यक्रमही होणार आहेत.


