अहिल्यानगर/प्रतिनिधी
विद्यार्थी हेच शिक्षकाचे खरदैवत असून तेच शिक्षकाचे योग्य मूल्यमापन करू शकतात असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या खजिनदार ज्येष्ठ विधीज्ञ दीपलक्ष्मी म्हसे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या रेसिडेन्शिअल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रा.सीताराम काकडे यांनी नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतली.या निमित्ताने संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने प्रा.काकडे यांचा गौरव व सत्कार समारंभ त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,यावेळी त्या बोलत होत्या.
अड.म्हसे पुढे म्हणाल्या की, प्रा. काकडे यांच्यासारखे शिक्षक हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतात व संस्थेसाठी आणि महाविद्यालयासाठी भूषण असतात.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी श्री. काकडे यांनी परिश्रम घेतले. तसेच विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी पुढे जावे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी जावे नाट्य क्षेत्रामध्ये काम करावे विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा यासाठी प्रा. काकडे नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांनी सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
यावेळी बोलताना प्रा.काकडे यांनी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून ते एक सेवा कार्य आहे.एवढे वर्ष मला विद्यार्थ्यांची सेवा करता आली हे मी माझे भाग्य समजतो,कारण शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठे ही विद्यार्थ्यांसाठी आहेत.विद्यार्थी आहेत म्हणून त्यांच्या असण्याला अर्थ आहे. व शिक्षकांच्याही असण्याला अर्थ आहे,यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मानून काम करणे गरजेचे आहे.त्यासाठी अध्यापकाने आपले ज्ञान कायम अद्यावत ठेवावे व देशाचे भावी आधारस्तंभ मजबुतीने घडवावेत.असे आवाहनही श्री. काकडे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर,प्रा.रवींद्र देवढे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमासाठी संस्थेच्या सदस्य प्रसिद्ध वास्तु विशारद राजश्री जगताप,प्राचार्य विजयकुमार पोकळे,उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, उपमुख्याध्यापक सौ.जयश्री दरे, पर्यवेक्षक प्रा.वैशाली जाधव, पर्यवेक्षक धनंजय म्हस्के, पर्यवेक्षक बाळासाहेब पवार यांसह अध्यापक-प्राध्यापक बंधू-भगिनींची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.दत्तात्रय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक प्रा.वैशाली जाधव यांनी आभार मानले.



