माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज मुंबई हवामान
खात्याने व्यक्त केला आहे. धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुढच्या तीन-चार तासांमध्ये वीजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसंच 30-40 किमी
प्रती तासाच्या वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कच्ची तसेच
टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दुरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी
होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानात म्हटले आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी.
भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर , चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयांत गुरुवार 16 मार्च आणि शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा
इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा आणि गोंदिया
जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.