माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा युवा सेनेचे
अध्यक्ष आदित्य ठाकरे हे संभाव्य डॅमेज कंट्रोलसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत.शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे हे पायउतार झाले.
त्यानंतर शिंदे यांनी सातत्याने शिवसेनेला धक्के देणे सुरू केले असून चाळीस आमदारांपाठोपाठ १४ ते १६ खासदारांचा गटही त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. याबरोबरच शिवसेनेमधील नेते,
उपनेते अशा पदांवरील महत्त्वाच्या व्यक्तींनीही शिंदे यांच्यासोबत जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ठाकरे यांनी कोणावरही अवलंबून न राहता संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी तळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील जनतेशी आणि लाखो मनांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे २१ ते २३ जुलै २०२२ या काळात महाराष्ट्रातील शिव संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत.
या यात्रेच्या प्रथम टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डीमधील समाजातील सर्व वयोगट आणि समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत.
शिव संवाद यात्रा वेळापत्रक : शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा दि. २१ जुलै २०२२ रोजी, भिवंडी येथे दुपारी १२.०० वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे सायं ६.३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.
– दुपारी १२ वाजता भिवंडी येथे मेळाव्याने शिव संवाद यात्रेला सुरुवात- दुपारी ०२:३० ते ०२:५० शहापूर येथे स्वागत संवाद- दुपारी ०३:५० ते ०४:१५ इगतपुर येथे स्वागतसंवाद संध्याकाळी ०५:४५ ते ०६:४५ वाजता नाशिक येथे शिव संवाद मेळावा
दि. २२ जुलै २०२२ या शिव संवाद यात्रेच्या द्वितीय दिवशी सकाळी ११.४५ या वेळेत मनमाड शहरात संपन्न होणाऱ्या मेळाव्यात श्री. आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार असून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची सांगता संभाजीनगर येथे सायं ६.३० वाजता होणाऱ्या मेळाव्याने होईल.
– सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ मनमाड येथे शिव संवाद मेळावा- दुपारी ०१:४० ते २ वाजेपर्यँत येवला येथे स्वागत संवाद- दुपारी ०२:४५ ते ३ वाजेपर्यँत वैजापूर येथे स्वागत संवाद- संध्याकाळी ०५:३० ते ०६:३० वाजता संभाजीनगर येथे शिव संवाद मेळावा
दि. २३ जुलै २०२२ या शिव संवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वा पैठण येथे शिवसैनिकांकडून श्री. आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे.
यात्रेची सांगता सायं ५.१५ शिर्डी येथे शिर्डी वासीयांकडून आदित्यसाहेबांच्या स्वागताने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. साईंच्या दर्शन आणि आशीर्वादाने होईल.
– सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यँत पैठण येथे स्वागत संवाद- दुपारी २ ते ०२:२० गंगापूर येथे स्वागत संवाद- दुपारी ०२:५० ते ४ वाजेपर्यँत नेवासा येथे शिव संवाद मेळावा
– संध्याकाळी ०४:४५ ते ०५:१५ शिर्डी येथे स्वागत आणि दर्शन आणि मुंबईला परतणार आहे.